काळानुसार स्वतः मध्ये बदल करा – शरद तांदळे महाराष्ट्र युवा महासंघाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन
डॉ सुदर्शन घेरडे यांनी स्थापनेसाठी घेतला पुढाकार

पिंपरी(प्रतिनिधी) युवकांनी आपल्यातील क्षमता ओळखून आपले निर्णय स्वतः घ्यावेत. परिस्थितीनुसार आपण आपल्यात बदल केले नाही तर येणारी परिस्थिती अवघड आहे. आपल्याला रोज उठून आपल्याला आवडणारी गोष्ट करावी वाटने हेच खरे यश आहे. असे मत उद्योजक लेखक शरद तांदळे यांनी व्यक्त केले .
महाराष्ट्रातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक, शैक्षणिक, व्यवसायिक, औद्योगिक क्षेत्रात त्यांना मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र युवा महासंघ’ या नव्या युवा संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.या संघटनेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती पराग मते, राजकुमार धुरगुडे पाटील, दीनेश कदम , बाळासाहेब रास्ते, भगवान घेरडे, रामराजे काळे, अविनाश घेरडे,गणेश बडे, राजू पवार, रवी देशमुख, प्रभू महाराज माळी, अमोल करांडे, सुगंधा करांडे, समीर पूनावाला, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुदर्शन घेरडे उपस्थित होते.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुदर्शन घेरडे म्हणाले की, “आजचा युवक हा केवळ आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठीच नव्हे, तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहील, यासाठीच महाराष्ट्र युवा महासंघाची स्थापना करण्यात आली आहे.” या महासंघाद्वारे शिक्षण, रोजगार, उद्योग, क्रीडा , आरोग्य, सामाजिक न्याय आणि नेतृत्व विकास यांसारख्या विविध क्षेत्रांत युवकांना मार्गदर्शन व मदत केली जाणार आहे.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महासंघाच्या भविष्यातील कार्यपद्धती व युवकांसाठी असलेल्या संधींबद्दल सविस्तर माहिती दिली. उद्घाटन समारंभाला मोठ्या संख्येने युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. सुत्रसंचलन अभिषेक अवचार यांनी केले.